पर्यटनस्थळांवरील प्रवेशबंदी आदेश मागे घेण्याची मनसेची तहसीलदारांकडे मागणी.
पर्यटनस्थळांवरील प्रवेशबंदी आदेश मागे घेण्याची मनसेची तहसीलदारांकडे मागणी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शाहुवाडी तालुक्यातील विविध धबधबे व पर्यटनस्थळांवरील प्रवेशबंदी आदेशाचा फेरविचार करून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाहुवाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग कदम यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत बर्की, मननोली, उचकुळ, पाळेश्वर, केर्ली, सोनोली येथील धबधबे तसेच कांडवण धरण परिसरात स्थानिक नागरिक व पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आदेशामुळे हॉटेल व्यावसायिक, चहाविक्रेते, भाजीपाला व खाद्यपदार्थ विक्रेते, वाहतूक व्यावसायिक आणि अन्य लहान व्यावसायिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
व्यवसायासाठी अनेकांनी बँका व पतसंस्थांकडून कर्ज घेतले असून पर्यटन बंद राहिल्यास त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवेल, असा इशाराही मनसेने दिला आहे. सध्या पावसाचा जोर कमी होत असल्याने हवामानाचा आढावा घेऊन प्रवेशबंदी आदेशाचा फेरविचार करावा आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था करून पर्यटन सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तालुक्यातील व्यापारी व व्यावसायिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

No comments: