एका पराभवाने खचणार नाही; गावाच्या विकासासाठी माझी वाटचाल अविरत सुरू राहील’ — अजय बापूसाहेब पाटील"
‘एका पराभवाने खचणार नाही; गावाच्या विकासासाठी माझी वाटचाल अविरत सुरू राहील’ — अजय बापूसाहेब पाटील"अजय पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा साध्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाचं कौतुक सर्वत्र.
खोची (प्रतिनिधी):
खोची गावचे सुपुत्र तथा माजी हातकणंगले पंचायत समिती उपसभापती मा. अजय बापूसाहेब पाटील यांचा वाढदिवस यंदा कोणताही गाजावाजा, दिखाऊपणा किंवा अनाठायी खर्च न करता अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर हितचिंतक, मित्रपरिवार, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सायंकाळी सुलोचना मल्टीपर्पज हॉल येथे आपल्या जिवलग, मित्रपरिवार आणि समर्थकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजय पाटील यांच्या राजकीय, सामाजिक आणि जनहिताच्या कार्याचा गौरव केला. डी. एस. पाटील सर यांनी आपल्या मनोगतात अजय पाटील यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा आणि विकासाभिमुख कार्याचा उल्लेख करून त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले.
समस्त बाबर समाजाच्या वतीने बाळासाहेब बाबर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अष्टविनायक तरुण मंडळ व चव्हाण परिवाराच्या वतीने एम. के. चव्हाण (दादा) यांनी आपल्या खास शैलीत अजय पाटील यांच्या कार्याचा गौरव करत, "पराभव हा यशाचा पाया असतो. पराभवाने न खचता नव्या जोमाने समाजासाठी उभे राहा," असा प्रेरणादायी संदेश देत त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी नवी ऊर्जा दिली.
अजय पाटील यांचे सहकारी प्रमोद सूर्यवंशी (सरकार) यांनीही त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा उल्लेख करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आभार प्रदर्शनाच्या वेळी बोलताना अजय बापूसाहेब पाटील म्हणाले, "माझ्या गावाने आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने मला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आहे. एका पराभवाने मी खचणार नाही. गावाच्या विकासासाठी आणि समाजहितासाठी माझे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने समजून घ्याव्यात," असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
क्रिकेटमधील आपल्या अनुभवाचा उल्लेख करत ते म्हणाले, "संघाची योग्य बांधणी केली तर विजय निश्चित असतो. येणाऱ्या काळात माझी टीम पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल आणि निश्चितच यश संपादन करेल." त्यांच्या या वक्तव्यामुळे अजय पाटील युवा मंचाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला.
या वाढदिवसानिमित्त खोची व परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, हितचिंतक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी (सरकार), जय भवानी पतसंस्थेचे संचालक विरोचन सरकार, बबनराव पाटील,एम. के. चव्हाण (दादा), चंद्रकांत घोडके, अमृतसिंह सरकार, अश्विन वाघ, मिलिंद सरकार, पांडुरंग चव्हाण, बाळासाहेब बाबर, डी. एस. पाटील सर, उत्तम पाटील, भाऊसो पवार, रामचंद्र मगदूम, बबलू सरकार, नंदकुमार आडके, शिवाजीराव इंगळे, हनुमंत पाटील, हर्षवर्धन चव्हाण, बाळासाहेब कुरणे, अमोल पाटील, ग्रा.प.सदस्य राजू पाटील, वैभव पाटील, भागवत वाघ, रमेश जाधव,जयराज पाटील, शशिकांत गुरव, आनंद डवरी, प्रकाश गुंडवडे,समस्त बौद्ध समाज, प्रमोद बाबर युवा मंच, संपूर्ण पाटील परिवार तसेच खोची गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधेपणा, स्नेह, जनसंपर्क आणि समाजसेवेचा संकल्प यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा वाढदिवस सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

No comments: