Header Ads

कडवी नदीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संवर्धनाची सामूहिक बांधिलकी आवश्यक :तहसीलदार शुभांगी जाधव.

 कडवी नदीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संवर्धनाची सामूहिक बांधिलकी आवश्यक :तहसीलदार शुभांगी जाधव.

~~~~~~~~~~~~~~~~~~~
मलकापूर - रोहित पास्टे.
~~~~~~~~~~~~~~~~~~

मलकापूर, दि. ११ : आंबा परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कडवी नदीला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरणीय महत्त्व जपायचे असेल, तर 'चला जाणूया नदीला' या अभियानांतर्गत प्रत्येकाने नदी संवर्धनाची सामूहिक बांधिलकी स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहूवाडीच्या तहसीलदार शुभांगी जाधव यांनी केले.

कडवी नदी शौर्य दिन व नदी संवर्धन जागर सोहळ्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहूवाडी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब गंद्रे होते.

प्रारंभी तहसीलदार शुभांगी जाधव यांच्या हस्ते कडवी नदीच्या जलकुंभाचे पूजन करण्यात आले. कडवी नदी संवर्धन समितीचे जलप्रहरी राजेंद्र लाड यांनी प्रास्ताविक करून 'चला जाणूया नदीला' अभियानाची भूमिका स्पष्ट केली.

इतिहास अभ्यासक प्रा. सुहास नाईक यांनी कडवी नदीच्या उगम परिसरात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा दाखला देत नदीचा ऐतिहासिक वारसा उलगडून सांगितला. प्रा. प्रकाश नाईक तसेच शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एम. आर. पाटील यांनी कडवी नदीच्या संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित करताना भावी पिढ्यांसाठी नदीचे जतन करण्याचे आवाहन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी ॲड. अरविंद कल्याणकर तसेच मत्स्यबीज संगोपक प्रमोद माळी यांचा कडवी नदी संवर्धन समिती व सत्यशोधक कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कृषी सहाय्यक प्रदीप भोसले, ॲड. अरविंद कल्याणकर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक राहुल पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक अशोक मोरे, दत्तात्रय भोसले, ए. टी. पाटील, मत्स्य विभागाचे सहाय्यक अधिकारी एस. टी. खाडे, सीमा मराठे, डी. जी. लांबोर, निलेश घोलप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आभार संभाजी लोहार यांनी मानले.

चौकट : इतिहासाची साक्ष देणारी कडवी नदी

सन १७०२ मध्ये विशाळगड किल्ला जिंकण्यासाठी खुद्द बादशहा औरंगजेबाला मोहिमेवर यावे लागले. गड जिंकून परतताना पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या कडवी नदीने त्याच्या सैन्याचा मार्ग रोखला. या महापुरात हजारो अशरफ्या, घोडे व युद्धसाहित्य वाहून गेले. सह्याद्रीच्या गनिमी काव्याला कडवी नदीच्या रौद्ररूपाची साथ लाभल्याने स्वराज्याच्या लढ्यात हा प्रसंग महत्त्वाचा ठरल्याचा ऐतिहासिक संदर्भ प्रा. प्रकाश नाईक यांनी यावेळी मांडला.

No comments:

Powered by Blogger.