शेंबाळपिंपरी येथेच अप्पर तहसील कार्यालय कायम ठेवण्याची राज्य शासना कडे नागरिकांची एकमुखी मागणी!
शेंबाळपिंपरी येथेच अप्पर तहसील कार्यालय कायम ठेवण्याची राज्य शासना कडे नागरिकांची एकमुखी मागणी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शेंबाळपिंपरी,बेलोरा आणि खंडाळा महसुल मंडळांतील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, पुसद यांना निवेदन सादर करून महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय शेंबाळपिंपरी येथेच कायम ठेवावे अशी जोरदार मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेंबाळपिंपरी हे पुसद तालुक्यातील सर्वात मोठ्या महसुली गावांपैकी एक असून, अनेक गावांसाठी प्रशासकीय व व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. हे गाव राज्य महामार्गावर असल्याने नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना ये-जा करणे अत्यंत सोयीचे आहे.
तसेच इसापूर धरण व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित अनेक शासकीय कामकाज या परिसरातून होत असल्यामुळे शेंबाळपिंपरीचे प्रशासकीय महत्त्व अधिक वाढले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक योगदान आणि सामाजिक वारसा यामुळेही या गावाला विशेष ओळख आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, परिसरात साखर उद्योग, मत्स्य व्यवसाय, कापूस व्यापार आणि इतर औद्योगिक व कृषी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याने अप्पर तहसील कार्यालय येथेच कार्यरत राहणे नागरिकांच्या हिताचे आहे.
त्यामुळे शासनाने मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय इतरत्र हलवू नये व शेंबाळपिंपरी येथेच तातडीने सुरू करून कायम ठेवावे, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments: