उपराळा तलावावर १७ शेतकऱ्यांच्या केबल लंपास. साडेचार लाखांचा डल्ला.
उपराळा तलावावर १७ शेतकऱ्यांच्या केबल लंपास. साडेचार लाखांचा डल्ला.
-------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
---------------------------
कागल : कागल तालुक्यातील अवचितवाडी येथील उपराळा तलाव परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री मोठी धाड टाकून तब्बल १७ हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत केबल कापून नेल्या आहेत. या धाडसी चोरीत शेतकऱ्यांचे अंदाजे ४ ते ४.५० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
उपराळा तलाव परिसरातून अनेक शेतकरी विद्युत मोटारींद्वारे आपल्या शेतीला पाणी पुरवठा करतात. शनिवारी सकाळी शेतकरी नेहमीप्रमाणे पाणी पाजण्यासाठी तलावावर गेले असता, त्यांना सर्व मोटारींच्या केबल गायब असल्याचे दिसले. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रत्येक शेतकऱ्याची साधारण ३०० ते ४०० फूट लांबीची केबल कापून नेली आहे.
केबल चोरी गेलेल्यांमध्ये संतोष कारंडे, प्रकाश धनवडे, दिपक पाटील, मा. संजय सदाशिवराव मंडलिक, उत्तम पाटील, संतोष कारंडे, पांडुरंग कारंडे, बापूराव
कारंडे, विनायक मोरबाळे, प्रकाश धनवडे, उमाजी शिंदे, चिमकाई देवी पाणी वापर संस्था, सागर आंगज, नारायण मुसळे, भिकाजी केशव केंगार, राजेंद्र चौगुले आणि संभाजी मोरे या वैयक्तिक व संस्थात्मक सभासदांच्या केबल चोरीला गेल्या आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर आणि पिके जोमात असतानाच पाणी पुरवठा खंडित झाल्याने पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने मुरगूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
मुरगूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

No comments: