Header Ads

कर्तृत्व, जनसेवा आणि विकासाचा ध्यास; अमोल एकळ यांचे कार्य ठरतेय प्रेरणादायी

 कर्तृत्व, जनसेवा आणि विकासाचा ध्यास; अमोल एकळ यांचे कार्य ठरतेय प्रेरणादायी

महिमानगड ते गांधीनगरपर्यंत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे युवा व्यक्तिमत्त्व; वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव.

-----------------------------
 कोल्हापूर प्रतिनिधी :
---------------------------
 जिद्द,मेहनत, समाजसेवा आणि विकासाची दृष्टी या चार गोष्टींच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे युवा व्यक्तिमत्त्व म्हणजे अमोल महादेव एकळ. आज, १५ मे २०२६ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कर्तृत्व, दानशूर वृत्ती आणि समाजाभिमुख कार्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महिमानगड येथील असलेले अमोल एकळ यांनी व्यवसायाच्या निमित्ताने गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे आपल्या कार्याचा ठसा उमटवला. “महिमानगड ही माझी जन्मभूमी आणि गांधीनगर ही कर्मभूमी,” असे ते अभिमानाने सांगतात. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आणि लोकांशी असलेला थेट संपर्क यामुळे अनेक प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आले आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी उभी केलेली कार्यपद्धती आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

आई शालन आणि वडील महादेव यांचे संस्कार तसेच स्वर्गीय आजोबा चंद्रकांत जाडकर यांच्या शिकवणीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव आहे. जनसेवेची भावना त्यांच्या नसानसांत भिनलेली असून, आजोबांच्या स्मरणार्थ त्यांनी विविध मंदिरांच्या बांधकामासाठी तसेच सामाजिक मंडळांना भरीव आर्थिक मदत केली आहे.

कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या तावडे हॉटेल चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अमोल एकळ यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एस.टी. आणि केएमटी बस थांबे स्थलांतरित करण्यात आले आणि या परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

याचबरोबर सातारा ते पंढरपूर राज्य मार्गावरील महिमानगड गावासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे १०० लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांना महिमानगड येथे अधिकृत थांबा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली वडूज-महिमानगड एस.टी. बससेवाही त्यांच्या प्रयत्नांचे फलित मानली जाते.

---------------------------------------------

महिमानगड किल्ला संवर्धनासाठी धडपड.

----------------------------------------------

शिवकालीन महिमानगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी अमोल एकळ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. किल्ल्याची डागडुजी, माहिती केंद्र आणि पर्यटन विकास व्हावा यासाठी त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे पुरातत्त्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने यांनी किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर महसुली दस्ताऐवजांची प्रक्रिया सुरू झाली असून, महिमानगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

इतकेच नव्हे तर महिमानगडावरील प्राचीन हनुमान मंदिरात वीज पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जात आहे.

समाजहित, विकास आणि जनसेवा या त्रिसूत्रीवर काम करणारे अमोल एकळ हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळातही त्यांच्या कार्याला अशीच यशस्वी वाटचाल लाभो, अशा भावना व्यक्त होत आहेत.

आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेल चे हितचिंतक अमोल एकळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Powered by Blogger.