दिंडनेर्लीत कदम परिवारातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी आयुष्यभर कार्य केले. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
दिंडनेर्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम हे गेली अनेक वर्षे आपल्या निवासस्थानी विविध महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या करत आहेत. महापुरुषांचे विचार समाजापर्यंत, विशेषतः लहान मुलांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
महापुरुषांचे विचार कृतीत उतरवून समाजप्रबोधनाचा संदेश देणारा कदम परिवाराचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

No comments: