वर्षावासानिमित्त 'पिंपळ' वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वर्षावासानिमित्त 'पिंपळ' वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~पुसद /काकडदाती : गुरुपौर्णिमा तसेच आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या पवित्र वर्षावास पर्वाचे औचित्य साधून गोविंदनगर, काकडदाती येथील पंचशील ध्वजाजवळ पिंपळ वृक्षाचे रोपण उपासिका मीनाक्षी मोटघरे (गोटे) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यशस्विनी महिला मंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच बौद्ध व वारकरी परंपरेतील वर्षावासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपासिका मीनाक्षी मोटघरे (गोटे) यांनी पिंपळ वृक्षाचे वैज्ञानिक व अध्यात्मिक महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, पिंपळ हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त वृक्ष असून तो मोठ्या प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) उपलब्ध करून देतो. भिक्षू वर्षावास काळात जप, तप, चिंतन आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याला विशेष महत्त्व देतात. पिंपळ वृक्ष शांतता, ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत पूरक मानला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वर्षावासाच्या निमित्ताने प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले."मिलिंद प्रश्न"ह्या बौद्ध ग्रंथ वाचनाच्या शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी चिमुकल्या अक्षर रणवीर या वाचनकर्त्यास दिल्या.
यावेळी पांडुरंग मनवर, बबन खंदारे, मनोज गवई, संदेश रणवीर, मिलिंद कांबळे, आकाश खंदारे, बंटी पाटील, धीरज कांबळे, बापूराव धुळे, ज्ञानेश्वर कोल्हे, सतीश खंदारे, राहुल पाईकराव, अक्षर रणवीर, ऋषिकेश खिल्लारे, सुमेध खंदारे तसेच यशस्विनी महिला मंडळाच्या संध्या रणवीर, रोहिणी खंदारे, प्रिया कांबळे, अरुणा धुळे, सुशीला जोगदंडे, प्रज्ञा धुळे, तनिष्का गोडे आणि अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments: