कौलवमध्ये बाल वारकऱ्यांच्या दिंडीने गाव 'वारीमय'; आषाढी एकादशी उत्साहात साजरी.
कौलवमध्ये बाल वारकऱ्यांच्या दिंडीने गाव 'वारीमय'; आषाढी एकादशी उत्साहात साजरी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर कौलव (ता. राधानगरी) येथील केंद्र शाळा, कौलव गर्ल्स हायस्कूल आणि बी. के. पाटील (कौलवकर) शाळेच्या वतीने बालवारकऱ्यांची भव्य पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल-रुक्मिणी'चा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर आणि डोईवर तुळशीवृंद घेतलेल्या बालवारकऱ्यांमुळे संपूर्ण कौलव नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. पारंपारिक वारकरी पोशाखात नटलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. ठिकठिकाणी गावकऱ्यांनी आणि महिलांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून बालवारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण गावाला पंढरपूरच्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
विठ्ठल-रुक्मिणीच्या भव्य पालखीने आणि भजनावळीने वातावरणात एक अपूर्व चैतन्य निर्माण केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राची समृद्ध वारकरी संस्कृती आणि संस्कार रुजण्यास मदत झाली, अशी भावना शाळा प्रशासनाने व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

No comments: