राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाला सकारात्मक दिशा देणारी बैठक संपन्न
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाला सकारात्मक दिशा देणारी बैठक संपन्न.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~पुसद तालुक्यातील माळपठारावरील गावांसाठी ईसापूर प्रकल्पांतर्गत प्रस्तावित उपसा सिंचन (लिफ्ट इरिगेशन) योजनेबाबत जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंद पाटील, विधान परिषद सदस्य प्राजक्त तनपुरे, पुसद नगरपरिषद अध्यक्षा मोहिनी नाईक, संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच माळपठार परिसरातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ईसापूर प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनेची आवश्यकता, पाण्याची उपलब्धता तसेच अवर्षणग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत लिफ्ट इरिगेशन योजनेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
तसेच, या योजनेसाठी आवश्यक तांत्रिक आराखडा व प्राथमिक प्रस्ताव एका महिन्याच्या आत तयार करून सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे पुसद तालुक्यातील माळपठार भागातील गावांतील शेतकऱ्यांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाणी डोळ्यांनी दिसते परंतु त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही हे शेतकऱ्यांची वाक्य नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी माननीय मंत्री विखे पाटील यांच्यासमोर व्यक्त करून या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात त्याप्रसंगी आणून दिले.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments: