९० हजार मातीच्या बाप्पांतून निसर्गरक्षणाचा संदेश! यंदा घराघरात विराजमान होणार पर्यावरणपूरक गणराया; मूर्ती १०–१५ टक्क्यांनी महाग
९० हजार मातीच्या बाप्पांतून निसर्गरक्षणाचा संदेश! यंदा घराघरात विराजमान होणार पर्यावरणपूरक गणराया; मूर्ती १०–१५ टक्क्यांनी महाग.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अमरावतीसह विदर्भात गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव केवळ भक्तीचा नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा उत्सव ठरणार आहे. मूर्तीकारांनी तब्बल ९० हजार ते १ लाख पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती तयार करून निसर्गरक्षणाचा संदेश दिला आहे.
यंदा ग्राहकांसाठी ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंत २५ ते ३० प्रकारांच्या आकर्षक गणेशमूर्ती उपलब्ध असणार आहेत. डोळे, मुकुट, वस्त्र, दागिने आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मूर्तींना अंतिम रूप दिले जात आहे.
मूर्तींची विक्री ११ सप्टेंबरपासून सुरू होणार असून सुमारे २०० रुपयांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध राहतील. मात्र, मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्तींना वाढती पसंती मिळत असल्याने, "घराघरात पर्यावरणपूरक बाप्पा" हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याचा विश्वास मूर्तीकारांनी व्यक्त केला आहे.

No comments: