गणेशोत्सवात ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’चा संदेश चव्हाणवाडीत जय हनुमान तरुण मंडळाचे रक्तदान शिबिर; ४० रक्तदात्यांचा सहभाग
गणेशोत्सवात ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’चा संदेश चव्हाणवाडीत जय हनुमान तरुण मंडळाचे रक्तदान शिबिर; ४० रक्तदात्यांचा सहभाग
-------------------------गांधीनगर प्रतिनिधी :
-----------------------
करवीर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक कार्याची जोड देत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महालक्ष्मी ब्लड बँकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देत मंडळाने ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा प्रेरणादायी संदेश दिला.
जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवाच्या काळात केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, उपाध्यक्ष साई करंबे यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, यशवंत चव्हाण, कृष्णा करंबे, विकास थोरवत, शिवाजी सावंत, अर्जुन करंबे, सुशांत करंबे, विकी चव्हाण, अभिषेक चव्हाण आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, भक्तीसोबत समाजसेवेचा संदेश देणाऱ्या जय हनुमान तरुण मंडळाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

No comments: