सुख-समृद्धीच्या मंगल वातावरणात गणेश पार्कमध्ये गौराईला भावपूर्ण निरोप; पारंपरिक विधींनी विसर्जन संपन्न
सुख-समृद्धीच्या मंगल वातावरणात गणेश पार्कमध्ये गौराईला भावपूर्ण निरोप; पारंपरिक विधींनी विसर्जन संपन्न.
कोल्हापूर प्रतिनिधी : विजय बकरे.
---------------------------------------
कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर येथील गणेश पार्कमध्ये शनिवारी (दि. १९ सप्टेंबर २०२६) गौराई विसर्जनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी पारंपरिक पद्धतीने सुवासिनी महिलांनी 'गौरीचे दोरे' (पोवते) घेण्याचा धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पूर्ण केला. त्यानंतर दुपारनंतर गौराईला भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
गणेश पार्क परिसरात महिलांनी गौरीची आरती, ओटी भरणे, हळद-कुंकू आणि पारंपरिक पूजा करून गौराईचे दर्शन घेतले. त्यानंतर "पुढच्या वर्षी लवकर या" असा जयघोष करत गौराईला निरोप देण्यात आला.
गौराईच्या गळ्यात अर्पण केलेले पवित्र पोवते विसर्जनापूर्वी सुवासिनी महिलांनी गळ्यात धारण केले. हा दोरा महालक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानला जात असून घरात वर्षभर सुख, समृद्धी आणि बरकत नांदावी, अशी श्रद्धा व्यक्त करण्यात आली.
विसर्जन मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पारंपरिक गाणी, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गौराईचे विसर्जन करण्यात आले. गणेश पार्क परिसरात संपूर्ण सोहळा शांतता, उत्साह आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

No comments: