उदगाव-अंकली नदी पात्रात रक्तरंजित खून; पार्टीदरम्यान वादातून तरुणाचा मृत्यू.
उदगाव-अंकली नदी पात्रात रक्तरंजित खून; पार्टीदरम्यान वादातून तरुणाचा मृत्यू.
--------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
--------------------------------
उदगाव-अंकली दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात रविवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तरुणाचा खून झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लखन सुरेश घावट उर्फ बागडी (वय ३५, रा. जयसिंगपूर) असे मयताचे नाव असून, त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन घावट हा आपल्या काही मित्रांसोबत उदगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळील नदी पात्रात पार्टीसाठी गेला होता. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि त्यात एका साथीदाराने लखनच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
जयसिंगपूर परिसरात अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांत आधीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच गल्ली क्रमांक १३ मध्ये सुनील पाथरवट यांच्या खुनाची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा लखन घावटच्या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच उदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी तपासाचे चक्र वेगात फिरवले आहे. खुनाचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

No comments: