शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत मोर्चा; शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढा तीव्र.
शक्तीपीठ म
मार्गाविरोधात सांगलीत मोर्चा; शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढा तीव्र.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिरज तालुका | प्रतिनिधी : राजू कदम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोठा मोर्चा काढण्यात आला. या वेळी माजी खासदार Rajeev (Raju) Shetty यांनी प्रकल्पावर तीव्र टीका करत हा महामार्ग राज्यातील जनतेच्या हिताचा नसून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या बदल्यात आर्थिक बोजा वाढवणारा ठरेल, अशी भूमिका मांडली.
राज्यातील १२ जिल्ह्यांमधील हजारो एकर सुपीक जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम करणारा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
दरम्यान, सुधारित शक्तीपीठ महामार्गासाठी संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात मोजणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांच्या मते, शेतकरी व महिलांना ताब्यात घेऊन दडपशाही केली जात आहे. परभणीसह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून या महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र झाले आहे.
रत्नागिरी ते नागपूरदरम्यान आधीच महामार्ग अस्तित्वात असताना समांतर शक्तीपीठ महामार्ग उभारण्याची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना कंत्राटी कामगारांचे वेतन, ठेकेदारांची देणी, विविध योजनांची अनुदाने प्रलंबित असताना नव्या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्याचा निर्णय योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
या प्रकल्पाबाबत सरकारने शेतकरी व नागरिकांशी सविस्तर चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा मोर्चादरम्यान देण्यात आला.

No comments: