रणसिंग महाविद्यालयात शिक्षक पालक संवाद सभा.
रणसिंग महाविद्यालयात शिक्षक पालक संवाद सभा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब–वालचंदनगर येथे पालक शिक्षक संवाद सभा संपन्न झाली.संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पालक व शिक्षक यांचा समन्वय अधिक प्रभावी व्हावा,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणारे विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती,महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासाची गैरसोय पाहता सुरुकरण्यात येणारी बससुविधा इत्यादी बाबी पालकांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी सांगितले. समन्वयक डॉ. तेजश्री हुंबे यांनी पालक–शिक्षक संवादाचे शैक्षणिक, सामाजिक व भावनिक महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.
पालक समुपदेशन सत्रात प्रा.राजेंद्रकुमार डांगे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अभ्यासातील सातत्य,अभ्यास सवयी, मूल्यशिक्षण तसेच भविष्यातील करिअर संधी याविषयी पालकांशी सविस्तर संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.कला व वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम,सहअभ्यासक्रम,स्पर्धा परीक्षा तयारी,कौशल्याधारित शिक्षण तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत करण्यात येणाऱ्या शैक्षणिक बदलांची माहिती प्रा. डॉ. प्रशांत शिंदे व प्रा. डॉ. विलास बुवा यांनी सादर केली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक व नैतिक विकासावर महाविद्यालय विशेष भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संवाद सत्रात उपस्थित पालकांनी आपल्या सूचना, अपेक्षा व अनुभव मांडले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालय राबवत असलेल्या उपक्रमांबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातील काही रचनात्मक सूचना देखील दिल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत, पालक–शिक्षक–विद्यार्थी या त्रिसूत्री समन्वयातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य होऊ शकते,असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्या गुळीग व
प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments: