राज्यमंत्री नाईकांच्या पाठपुराव्याने अतिक्रमण धारकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे..!
राज्यमंत्री नाईकांच्या पाठपुराव्याने अतिक्रमण धारकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे..!
-------------------------
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी.
--------------------------
पुसद : शहरातील अतिक्रमण धारकांसाठी दिलासादायक अशी महत्वाची घडामोड समोर आली असून, राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिक्रमण धारकांना लवकरच “आखीव पत्रिका (नमुना ड)” मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. या प्रक्रियेत जागेची मोजणी, तसेच नगर रचना नियमावलीनुसार भूखंडांच्या अभिन्यासाला मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यानुसार पुसद शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांच्या भूखंडांचे मोजमाप करून अभिन्यास तयार करण्यात आले आणि ते नगर रचना विभागाकडे सादर करण्यात आले होते.
यापैकी शिवाजी वार्ड व नवल बाबा वार्ड या दोन वार्डांच्या अभिन्यासाला नगर रचना विभाग, पुणे यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीच्या आधारे संबंधित नागरिकांना आखीव पत्रिका देण्याची प्रक्रिया लवकरचं सुरु होईल. उर्वरित वार्डांबाबतही नियमानुकूल कार्यवाही सुरु असून लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मोहिनी इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, “नगर परिषद निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. उर्वरित वॉर्डांमधील कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.”
या निर्णयामुळे पुसद शहरातील अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे.
या लोकाभिमुख आणि लोकहिताच्या निर्णयासाठी घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने मोहिनी नाईक ह्यांनी महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महसुल विभागाचे आभार व्यक्त केले तसेच मंजुरी भेटलेल्या अभिन्यासातील लाभार्थी आता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील अशी माहिती नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी दिली.

No comments: