Header Ads

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर नांदणीमध्ये ‘सोनू महाराज’चा सुळसुळाट; अंगावर लाखोचे सोने, दरबारात महिलांचीच गर्दी

 नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर नांदणीमध्ये ‘सोनू महाराज’चा सुळसुळाट; अंगावर लाखोचे सोने, दरबारात महिलांचीच गर्दी.


जयसिंगपूर / प्रतिनिधी :

नामदेव भोसले.

--------------------------

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी परिसरात आणखी एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘सोनू महाराज’ नावाने ओळखला जाणारा हा तथाकथित गुरू स्वतःला बिरूदेवाचा अवतार असल्याचा दावा करत असून, त्याचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या व्यक्तीच्या गळ्यात व अंगावर लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने असून, महागड्या गाड्यांचा ताफा आणि आलिशान जीवनशैलीचे प्रदर्शन तो रील्सच्या माध्यमातून करत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, त्याच्या दरबारात प्रामुख्याने महिला भक्तांचीच उपस्थिती असल्याचेही समोर आले आहे.

घरगुती वाद, नोकरीतील अडचणी तसेच अपत्यप्राप्ती न होणे अशा वैयक्तिक समस्यांवर उपाय सांगण्याच्या नावाखाली महाराष्ट्रभरातून अनेक सुशिक्षित महिला त्याच्याकडे येत असल्याचे सांगितले जाते. ‘आशीर्वादामुळे अपत्यप्राप्ती झाली’ अशा दाव्यांचे व्हिडिओ वारंवार प्रसारित होत असून, त्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याची टीका होत आहे.

या प्रकरणातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे काही पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी तसेच राजकीय नेत्यांकडूनही या व्यक्तीला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्याचे पाच मठ सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

जयसिंगपूरमध्ये महिलेवर अत्याचाराचा आरोप

दरम्यान, जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये एका महिलेला अपत्यप्राप्तीच्या विधीच्या नावाखाली बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला ‘ मोटके’ नावाच्या व्यक्तीने पैशांचे आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

तसेच, संबंधित ‘सोनू महाराज’ हा काही वर्षांपूर्वी जयसिंगपूर येथील जे.जे. मगदूम इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेज परिसरात शिक्षण घेत असताना, अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचा प्रभाव पाहूनच या मार्गावर वळल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे. त्यानंतर त्याने ट्रस्ट स्थापन करून आज पाच शाखांपर्यंत विस्तार केल्याचे बोलले जात आहे.

‘वेळीच कारवाई नाही तर नाशिकसारखी पुनरावृत्ती’

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडालेली असताना, नांदणीतील हा प्रकारही तितकाच गंभीर असल्याचे नागरिकांचे मत आहे. अनेक राजकीय नेते व उद्योजक त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाईची मागणी

एकीकडे समाज विज्ञान आणि प्रगतीकडे वाटचाल करत असताना, दुसरीकडे सुशिक्षित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील घटकच अशा भोंदूबाबांच्या प्रभावाखाली येत असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर, अशा अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.