Header Ads

दानोळीतील खंडणी प्रकरणाला रक्तरंजित वळण; अपहरणानंतर व्यावसायिकाची निर्घृण हत्या. २५ लाखांच्या मागणीने उघड झाला कट; लोकेशन बदलत नातेवाईकांची दिशाभूल, उसाच्या शेतात सापडले धक्कादायक पुरावे.

 दानोळीतील खंडणी प्रकरणाला रक्तरंजित वळण; अपहरणानंतर व्यावसायिकाची निर्घृण हत्या.

२५ लाखांच्या मागणीने उघड झाला कट; लोकेशन बदलत नातेवाईकांची दिशाभूल, उसाच्या शेतात सापडले धक्कादायक पुरावे.

----------------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

शशिकांत कुंभार.

-------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी:

दानोळी (ता. शिरोळ) येथे सोमवारी रात्री घडलेल्या खंडणी व अपहरण प्रकरणाने अखेर रक्तरंजित वळण घेतले असून ४० वर्षीय व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री भरतेश यांना अज्ञातांनी जबरदस्तीने पळवून नेले. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधत २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचे निर्देश देण्यात आले.

यानुसार त्यांचे भाऊ महावीर व त्यांचे सहकारी सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र, अपहरणकर्त्यांनी सतत ठिकाण बदलत त्यांना गोंधळात टाकले. काही वेळानंतर मोबाईल बंद करून संपर्क तोडण्यात आला, ज्यामुळे संशय अधिक गडद झाला.

दरम्यान, रात्री उशिरा भरतेश यांचा खून झाल्याची माहिती समोर येताच दानोळी गाव हादरून गेले. संतप्त ग्रामस्थांनी तातडीने जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे धाव घेतली व कारवाईची मागणी केली.

गावकऱ्यांनी स्वतः शोधमोहीम राबवली असता शहरीमळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांची कार, चप्पल तसेच घटनास्थळी मफलर व बूट आढळून आले. या ठिकाणी झटापट झाल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत.

सकाळी पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपासाला वेग देण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीला बेपत्ता नोंद केल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलीसांकडून विविध पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.

या प्रकरणामागील खरा हेतू काय? खंडणीसाठीच हत्या झाली की अन्य कोणता वाद कारणीभूत आहे? याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.