Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज- मा. मदनदादा भोसले.

 आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज- मा. मदनदादा भोसले.

 

----------------------------------                                                                                                                       

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

----------------------------------                                                                                                                       

  "आपण काळाची पावले न ओळखता वाटचाल केली तर आपली फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून काळाची पावले ओळखून आपला शैक्षणिक प्रवास चालू ठेवावा" असा शुभ संदेश मा. मदनदादा भोसले यांनी दिला. येथील किसन वीर महाविद्यालयांमध्ये स्टाफ वेल्फेअर कमिटी व अंतर्गत दर्जा हमी कक्ष यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 पुण्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयातील तज्ञ  वक्ते डॉ. भूषण केळकर व मधुरा केळकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रंसगी संस्थेचे सचिव जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, संस्थेचे संचालक श्री. केशवराव पाडळे, डॉ. नितीन कदम, डॉ. प्रशांत कुलकर्णी  प्रा. रमेश डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे हे होते.

मदनदादा पुढे म्हणाले की, "जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाने उजळून निघत आहे. आपणही या प्रवासात सामील झालो पाहिजे, नाही तर आपण जगाच्या तुलनेत खूप मागे राहू यात शंका नाही."

या कार्यक्रमांनिमित्त आपल्या व्याख्यानात डॉ. भूषण केळकर यांनी "भारतात नवीन शैक्षणिक प्रणालीत बदल होत आहे. तो बदल सकारात्मक घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. काळाची पावले ओळखून आपण नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार नक्कीच केला पाहिजे. या नवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक नोकऱ्यांवर गदा नक्की येईल परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. ही जमेची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरून न जाता आपण नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार हा केलाच पाहिजे. जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान थक्क करणारे आहे."  व्याख्यानाच्या शेवटी, या नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. डॉ. भूषण केळकर आणि मधुरा केळकर यांनी समाधानकारक उत्तरे प्रेक्षकांना दिली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ गुरुनाथ फगरे म्हणाले की, "किसन वीर महाविद्यालयाची वाटचाल काळाची पावले ओळखून सुरु आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून सहभागी झाले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे." 

 या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, सेवक वर्ग व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंबादास सकट यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी करून दिला.  आभार श्री. भीमराव पटकुरे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. मंजुषा इंगवले यांनी केले.

Post a Comment

0 Comments