Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच योजना समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य विध्यार्थ्यानी करावे "

   पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच योजना समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य विध्यार्थ्यानी करावे "

प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी .

" आयुष्यमान भारत योजनेत सामील झालेल्या व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यास पात्र असून,समाजातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगार, शेतमजूर व शेतकरी वर्गातील लोकांपर्यंत हे पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच योजना समाजाच्या तळागाळात पोहचविण्याचे कार्य महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी करावे व त्यातूनच स्वतःच्या कुटुंबियांना व समाजाला या योजनेचा फायदा सांगावा " असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी केले.

जावली तालुका  आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत या योजने विषयी जनजागृती व्हावी म्हणून, जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे,पाच लक्ष विम्याचे सुरक्षा कवच या विषयाची माहीती देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्याधिकारी डॉ.भगवान मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणात प्राचार्य पुढे म्हणाले की, " आयुष्यमान भारत योजन किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे,या योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते." असे सांगून त्यांनी शासनाच्या विविध योजनाचे कौतुक करून योजनेचे महत्त्व ग्रामीण भागामध्ये कसे आहे या विषयी आपले विचार मांडले .

याप्रसंगी डॉ.भगवान मोहिते यांनीही मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की, " भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात." अशी माहीती देवून भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती.कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदि आयुष्मान भारत योजनेसाठी (ABY) पात्र ठरवण्यात आले आहेत असे सांगितले.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी म्हणाले की, " ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटूंबात वयस्क (१६-५९ वर्ष) नसणे, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति/ वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते.त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ति, निराधार, भीक मागणारे, आदिवासी आदि लोक कोणतही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात."

यावेळी आरोग्य विस्तार  अधिकारी श्री.सावंत, आरोग्य निरीक्षक श्री मानकुमरे, सहाय्यक श्री इथापे , सनियंत्रण अधिकारी श्रीमती निकम, तालुका डेटा ऑपरेटर श्रीमती वेंदे व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. संतोष कदम यांनी प्रास्ताविक केले.प्रा.संध्या निकम यांनी सूत्रसंचालन केले.तर शेवटी प्रा.रोहिणी खंदारे यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments