वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या चिकुर्डे-निलेवाडी प्रस्तावित पुलाच्या ठिकाणची शिवसेना जिल्हाप्रमुख संजयचौगुले यांच्याकडून पाहणी.

  वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या चिकुर्डे-निलेवाडी प्रस्तावित पुलाच्या ठिकाणची शिवसेना जिल्हाप्रमुख संजयचौगुले यांच्याकडून पाहणी.



-------------------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------------------------

       निसर्गाचा बिघडलेला समतोल पाहता अचानक पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्याचबरोबर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पाणी प्रवाहात रात्रीतुन अचानक वाढ होऊन नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण होत आहे. यामध्ये दुर्दैवाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पूरबाधित होणारे सर्वात पहिले गाव म्हणून निलेवाडी या गावचा क्रमांक लागतो. गावच्या तिन्ही बाजूला असणारी वारणा नदी आणि गावाच्या वेसेवरून जाणारा ओढा यामुळे या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. अचानक वाढणाऱ्या पाण्यामुळे जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते याकाळात निलेवाडी गावातील ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्यामुळे केवळ बोटीतूनच प्रवास करून सुरक्षित ठिकाणी पोहोचावे लागते. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत असून सामान्य नागरिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या आपात्कालीन काळामध्ये दळणवळणाची दुसरी कोणतीच पर्यायी सुविधा नसल्यामुळे विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सदरच्या चिकुर्डे-निलेवाडी येथे प्रस्तावित असणाऱ्या या पुलाच्या जागेची पाहणी केली. निलेवाडी ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्याकडून वेळोवेळी आंदोलने आणि निवेदनाच्या माध्यमातून वीस वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्रशासकीय उदासीनता आणि केवळ पूरबाधित कालावधीमध्ये तात्पुरती उपाययोजना करून वीस वर्षापासून प्रलंबित असलेला निलेवाडी-चिकुर्डे पुलाचा प्रश्न अद्यापही प्रशासन स्तरावर खेळवत ठेवलेला आहे. 

             सदरच्या चिकुर्डे धरण ते निलेवाडी ओढा इथपर्यंतचा पूल होण्याच्या मागणीचा हा प्रस्ताव ना मंजूर झालेबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळाले आहे. सदरच्या पुलामुळे केवळ निलेवाडीच नव्हे तर ऐतवडे खुर्द, वशी आणि कुरळप या गावातील ग्रामस्थांना देखील या पुलाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम सुरू करून सर्व निलेवाडी ग्रामस्थांना या अस्मानी संकटातून मुक्त करावं याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा प्रश्न पुन्हा लावून धरून वरिष्ठ नेत्यांच्या तसेच प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रश्न घालून लवकरात लवकर या प्रश्नाचे कायमस्वरूपी समूळ उच्चाटन करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाप्रमुख श्री संजय चौगुले यांनी निलेवाडी ग्रामस्थांना दिली. 

      तसेच यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत, त्यामुळे मागील काही वर्षातील म्हणजेच २००५, २०१९ आणि २०२१ या साली निर्माण झालेली पूरबाधित परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत देखील प्रशासनाला सूचना करणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले.

        यावेळी निलेवाडी गावचे शाखाप्रमुख करणसिंग टोपुगडे, उपशाखाप्रमुख अनिल लोहार, उदयसिंह शिंदे सरकार, संदीप दबडे,  जालिंदर जाधव, संतोष भोसले व शिवसैनिक उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.